Thursday 23 June 2011

छावाच्या दणक्याने शेतकऱ्यांना मिळाले बियाणे


Beed News
Wednesday, June 08, 2011 AT 05:00 AM (IST)
व्यंकटेश ऍग्रो एजन्सीचा परवाना निलंबीत
बीड (beed) - जिल्ह्यात खत आणि बियाण्यांची टंचाई जाणवत असतांना व्यापारी मात्र बियाण्यांचा साठा करुन शेतकऱ्यांची अडवणूक करत आहेत. मोंढ्यातील व्यंकटेश ऍग्रो एजन्सीमध्ये कपाशीचे बियाणे साठा करुन ठेवल्याची माहिती अखिल भारतीय छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मिळाल्यानंतर त्या ठिकाणी छापा मारुन जप्त केलेले बियाणे आज सकाळी पोलिस बंदोबस्तात शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले. बियाण्याचा साठा केल्या प्रकरणी व्यंकटेश ऍग्रो एजन्सीचा परवाना निलंबीत करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, रोहिणी नक्षत्रात जिल्ह्यात चांगला पाऊस झाला आहे. गेल्या वर्षी कापसाला विक्रमी भाव मिळाल्याने यावर्षी शेतकरी कापसाची लागवड करण्यास प्राधान्य देत आहेत. जिल्ह्यात कापसाच्या बियाण्याला मोठ्या प्रमाणात मागणी असतांना पुरवठा मात्र फारच अल्प प्रमाणात होत आहे. जो पुरवठा होत आहे तोही व्यापारी आपल्याकडेच साठा करुन ठेवत असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. शहरातील मोंढा भागात असलेल्या व्यंकटेश ऍग्रो एजन्सीमध्ये कपाशीचे बियाणे साठा करुन ठेवले असल्याबाबतची मागणी अखिल भारतीय छावाचे जिल्हाप्रमुख अशोक रोमण यांना मिळाल्यावरुन छावाच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी छापा टाकुन हे बियाणे ताब्यात घेतले. त्यानंतर आज सकाळी पोलिस बंदोबस्तात या बियाण्याच्या बॅग छापील किंमतीत वाटण्यात आल्या. याबरोबरच कलंत्री यांच्या दुकानात असलेला बियाण्याचा स्टॉकही पोलिस बंदोबस्तात शेतकऱ्यांना वाटप करण्यात आला. छावाच्या वतीने राबवण्यात आलेल्या या मोहीमेमुळे शेतकऱ्यांना वेळेत बियाणे मिळाले आहे. दरम्यान साठेबाजी करुन मल्लीका बीटी कापुस बियाणे विक्री करणारे व्यंकटेश एजन्सीचे मालक केदारनाथ जाजू यांच्या दुकानात कृषी अधिकारी एन.एस. राऊत यांच्या पथकान छापा टाकुन बियाणे जप्त केले. याबाबतचा अहवाल कृषी अधिकाऱ्यांना दिल्यानंतर त्यांनी व्यंकटेश ऍग्रो एजन्सीचा परवाना निलंबीत केला आहे. दरम्यान, छावा व कृषी विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या कारवाईने व्यापाऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे

No comments:

Post a Comment